Saturday, 11 June 2022

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा गुन्हा आहे. वेश्याव्यवसायाची भारताला पुरातन परंपरा आहे. देवदासी पद्धत पूर्वी भारतात अनेक ठिकाणी रूढ होती. फरक इतकाच की त्यावेळी स्वतः आई बाप मुलींना देवीच्या आणि म्हणजेच गावाच्या स्वाधीन करत. मग तिचे आई वडीलही तेवढेच गुन्हेगार. आणि हो, गुलाम सुद्धा! रुढींचे, परंपरांचे आणि अज्ञानाचे. आजही मुलांसाठीचे निर्णय बऱ्याचदा आई वडील घेताना दिसतात. आणि तो शिरसावंद्य मानून मुलं ऐकतात! आपल्याला गुलामीत राहायची सवय झालीये. स्वतःच्या आयुष्यावर अधिकारच नाहीये आपला. समाजाविरुद्ध बंड करून उठणारे फार कमी लोक असतात. तीळ तीळ तुटतात, भांड भांड भांडतात आणि कधीतरी असेच विरून जातात. चाकोरीतलं आपल्या मनाविरुद्ध जगणारे आपण सर्वच काही प्रमाणात वेश्या आहोत. गुलाम आहोत या समाजाचे. आपले अधिकार, हक्क आणि कर्तव्य आपल्याला माहितीच नाहीत. पुढे काही वर्षांनी आपण मोठे होतो आणि आपापले निर्णय स्वतः घेऊ लागतो. पण ते कशाच्या आधारावर? तर आपल्यावर झालेल्या संस्कारांच्या आधारावर. आणि तेच संस्कार जे समाजाच्या मान्यतांवर आधारलेले असतात! 

वेश्यांचं काय होतं? कोण मुलगी इतर चार पर्याय सहज उपलब्ध होऊ शकत असताना स्वतःहून शरीरविक्रय करायला तयार होईल? कोणत्या स्त्रीला आवडेल अभिमानाने वेश्याव्यवसाय करायला? कोवळ्या वयात तिची तस्करी होते, तिच्यावर देहविक्रयाची सक्ती केली जाते. परंतु पुढील काळात तिचे पुनर्वसन झाल्यानंतरही ती पुन्हा पुन्हा त्या व्यवसायाकडे का वळते? कारण तिला निर्णय स्वातंत्र्य नसतं. तिने नेमलेली माणसं असतात, जी गिर्हाईकांसोबतच तिची व्यसनंही पुरवतात आणि तिच्यावतीने तिचे सारे निर्णयही परस्पर घेतात. तिच्या पुनर्वसनाच्या आधी तिची व्यसनमुक्ती होणे गरजेचे आहे. वेश्यांच्या पुनर्वसनासाठी बऱ्याच स्वयंसेवी संघटना कार्यरत आहेत. त्यांचे पुनर्वसन होते, त्यांना काम मिळतं परंतु तिच्या शरीराला, तिच्याकडून मिळणाऱ्या पैशाला चटावलेले हेच पुरुष तिला पुन्हा पुन्हा शरीरविक्रय करण्यास भाग पडतात.

आपलंही काय वेगळं होतं? लहानपणीच्या इच्छा, स्वप्न त्याचं पुढे काय होतं? आपणच आपल्या स्वप्नांवर हसतो नाही का? एखादी गोष्ट आपल्याला हवी वाटते तेव्हा ती का हवी वाटते याचा विचार करायला हवा. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्याचे निर्णय आपले आपण घेता यायला हवेत. फक्त ते निर्णय योग्य असावेत याची जबाबदारी आई बाबांची. आपल्या जवळच्या माणसांना निर्णयसक्षम बनवणं हे आपलं सामाजिक उत्तरदायित्व आहे. कायदे करून व सोयी सुविधा उपलब्ध करून समाज प्रबोधन घडत नसतं, त्यासाठी विचार परिवर्तन होणं गरजेचं आहे. ज्ञान मिळवायला हवं, आपल्या हक्क, अधिकार आणि कर्तव्याविषयी जागरूक असायला हवं. आपण करत असलेली प्रत्येक कृती स्वैछिकच असायला हवी. 

आज जागतिक वेश्याव्यवसाय जागरूकता दिवस. पण तो फक्त ओळखला जातो. तो ज्या दिवशी साजरा केला जाईल तो सुदि


न.

'लग्न पाहावं करून'

 



'लग्न का करावं?' हा प्रश्न आजच्या पिढीला पडू लागला आहे. आणि त्यात वावगं तरी काय आहे म्हणा! कोणत्याही रुढीला, परंपरेला 'का?' विचारला गेला तर त्यात चूक ती काय? खरंतर लग्नव्यवस्थेची, कुटुंबव्यवस्थेची चिकित्सा करायलाच हवी आपण. त्यातून तिचे चांगले वाईट पैलू आपल्यालाच नव्याने समजतात. कालौघात बदलत गेलेली संस्कृती आणि पडत गेलेले पायंडे किती बरोबर किती चूक हे जाणवतं. परिस्थितीनुरूप झालेले बदल किती स्वीकारार्ह याची उत्तरं आपली आपल्यालाच मिळतात. या दोन्ही गोष्टी टिकवण्यासाठी अजून काही करता येऊ शकतं का या कल्पना नव्याने सुचत जातात. खरंतर आपली कुटुंबव्यवस्था आणि विवाहसंस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. पण तिला पूर्णपणे नाकारणे आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल हे नक्की.

आज समाजात लग्न होत नाहीत आणि लग्न करू इच्छित नाहीत अशा अविवाहितांसमोर अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यांना ढोबळमानाने 2 भागांत आपण विभागू शकत नाही. लग्न होऊनही एकमेकांशी फार पटत नाही हा विषय आपण तूर्तास बाजूलाच ठेवूया. समाजमान्यतेनुसार लग्नाचं वय जवळ असलेली, सव्वीसची होऊ घातलेली मुलगी म्हणून जेव्हा या गोष्टीचा विचार करते तेव्हा अनेक प्रश्न समोर येतात. त्यातल्या जमतील तेवढ्या विचारांना मांडायचा प्रयत्न मी करते.. 'माझ्या एकांतावर बंधनं येणार नाहीत ना? नव्या घरात नव्या माणसांकडून माझा स्वीकार होईल ना? माझ्या पूर्वायुष्यातील घटनांचा काही परिणाम होईल का? इतकी वर्षे जे माझं म्हणून मिळवलं, मिरवलं ते माझ्यापासून कायमचं दुरावेल का? माझ्याकडून काही अपेक्षा केल्या जातील का? आणि त्या अपेक्षांना मी किती पुरी पडू शकेन? नव्या जबाबदाऱ्या येतीलच पण त्यासाठी मी किती वेळ देऊ शकेन? इतरांचं सोडा, माझ्या जोडीदारकडूनही काही चुका होतील, माणूस आहे चुकतोच, मी मोकळ्या मनाने माफ करू शकेन का? माझ्याकडून चूक होणार नाहीत याची काळजी घेऊ शकेन का? नाती निभावून नेऊ शकेन का?' करियर, आर्थिक स्थैर्य, मुलं जन्माला घालायची म्हंटली तर आजच्या महागाईच्या काळात त्यासाठी लागणारं पुरेसं आर्थिक पाठबळ, हे व असे अनेक प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा मला वाटतं त्या प्रश्नांचा जन्म कुठून झाला हे पाहणं महत्वाचं ठरेल. आपल्या स्वभावाची, न्यूनगंडाची सगळी मुळं आपण ज्या परिस्थितीत वाढलो तिथे आपल्या बाळपणात गुरफटलेली असतात. हल्ली मुलं एकेकटी असतात. एकेकटीच वाढतात. घडतात. घरात स्वतःची खोली, जे जे काही लहान मुलांसाठी घरी येईल त्यावर पहिला हक्क त्याचा, अशाने मुलांना स्वतंत्र राहायची सवय लागते. त्याचे प्रश्न त्याचे स्वतःचे असतात, त्याच्या गरजा स्वतःपुरता मर्यादित असतात. त्याच्या कित्येक प्रश्नांची उत्तरं त्याची तो मिळवू लागतो. अशावेळी घराकडे, आईबाबांकडे त्यांच्या एकमेकांशी वागण्याकडे, पुढे पुढे समाजाकडे, इतर जोडप्यांकडे, काका काकी आणि त्यांच्या मुलांचं एकमेकांशी असलेलं नातं, एकूण समाजव्यवस्था आणि त्यानिमित्ताने कुटुंबव्यवस्था ते बाळ मोठं होताना डोक्यात फिट करत असतं. त्यांना तेवढंच दिसतं जितकं आपण दाखवतो. त्यावर त्यांची मतं आधारलेली असतात. किती घरात नवरा बायको मुलांसमोर आपलं प्रेम व्यक्त करतात? एकमेकांप्रतिच्या नाजूक भावना, प्रेमाचे हळवे क्षण बहुतेकदा बंद दाराआडच साजरे होतात. भांडणं आणि वाद मात्र आपण मुलांसमोरच घालतो. त्याला प्रेम दिसायला नको का? प्रेम समजायला नको? आर्थिक किंवा अजून कोणत्याही (मोठ्यांच्या) अडचणी किती पालक मुलांसमोर डिस्कस करतात? अडचणी आणि त्याचा सामना कसा करावा याचं बाळकडू त्यांना घरातच मिळायला हवं ना?

आपल्या मनात आपल्या स्वतःबद्दल जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा कोणताही निर्णय घ्यायला मन कचरत नाही. आणि आपण घेतलेला निर्णय निभावून नेण्यासाठी जी मनाची तयारी लागते, जी हिम्मत लागते ती बहुतेकदा आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. सगळ्या गोष्टी ट्रायल बेसिस वर करायची सवय लागल्यासारखे तरुण लग्नाकडेही तेवढ्याच कॅज्युअली पाहू लागले तर नवल वाटायला नको. काही नाती आपल्याला जन्माने मिळतात. काही आपल्याला नव्याने जोडायची असतात. मित्रांची आणि जोडीदाराची निवड आपली आपल्याला करायची असते. त्यात चूक झाली तर जबाबदारी आपल्यालाच घ्यायची असते. त्यामुळे जन्माने मिळालेली नाती जितकी स्वास्थ्यपूर्ण ठेवता येतील तेवढी ठेवावी म्हणजे नवी नातीही आपण सुदृढ करायचा प्रयत्न करतो. 

चिंता, अडचणी येतीलच पण त्यासोबत आपल्या माणसांना समजून घेण्याइतका समजूतदारपणा आपल्यात असेल तर लग्नाचा निर्णय घेणं सोपं जातं. आजच्या पिढीसमोरच्या प्रश्नांना समुपदेशन हा एकच पर्याय आहे पण पुढच्या पिढीला ते प्रश्न पडू नयेत याची जबाबदारी आपण घ्यायला हवी. असं मला वाटतं. कारण आजच्या आपल्या कुटुंबव्यवस्थेवर आणि विवाहसंस्थेवर माझा ठाम विश्वास आहे.


- मृगा

Tuesday, 8 March 2022

कचरा वेचणाऱ्या स्त्रिया आणि महिला दिन

"काम काय सांगू बाई पुरा जलमच कचऱ्यात गेला", गप्पा सांगाव्या तेवढ्या सहज ती बोलून गेली. बसलेल्या तिच्या सगळ्या मैत्रिणी खदाखदा हसल्या आणि माझे डोळे पाणावले.

कचरा वेचणाऱ्या महिलांना बोलावून तरुण भारतच्या कार्यालयात महिला दिन आयोजित केला होता. काही बुजत होत्या, काही लाजत होत्या, हसत तर सगळ्याच होत्या. दीड वर्षाच्या लेकीला कडेवर घेऊन माझ्याहून लहान आई आपली कचराकिर्दीची ओळख सांगत होती. बरं, गोष्ट एवढीच नाही तर त्यांचे अनुभव आणि कार्यालयातील युवतींचे प्रश्न यातही तफावत होती. आमचे प्रश्नच त्यांना समजत नव्हते आणि मला तर त्यांच्या उत्तरांचीच चीड येत होती. 'अंगाव आलाच कोण मरद तं तित्तेच हाणून पडायचा' म्हणणारी चार पोरांची आईस नवरा दारू पिऊन मारतो म्हणून माहेरी येऊन राहिलेली. देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचू देत नाही अशी त्यांची सरकारकडे तक्रार होती! दिवसभर वेचून 200 ची कडक नोट मिळवायची असेल तर पहारेकऱ्यांच्या हातावर पन्नासची चिरीमिरी ठेवावी लागते. प्रमाणित स्वछता दूत म्हणून पास मिळवायचा असेल तर 1200 रुपये मोजून महिन्याचा पास मिळतो. तो दर महिन्याला 100 रुपये देऊन रिन्यू करायचा. आणि हा आटापिटा कशासाठी? तर हाताचं घालायचं (ग्लोव्ज) तोंडाला मास्क आणि बुट मिळतात म्हणून. बरं, त्याचा उपयोग किती? तर शून्य! कारण ते घालून काम करताच येत नाही. पण असा मासिक पास ज्या स्त्रीकडे आहे ती वस्तीतली प्रतिष्ठित स्त्री. 

लहानसा विनोद झाला की त्यांचं खळाळतं निखळ हसू पदराच्या ओच्याने नाहीतर ओढणीने झाकण्याची त्यांची धांदल, एखाद्या मुद्द्यावर एकमेकींवरच ताशेरे ओढत घातलेला सावळा गोंधळ, तुला ओळख सांगता येत नाहीतर निदान आडनाव आणि नवऱ्याचं नाव सांग म्हणत धीर देणाऱ्या बायका, 'आमी नगरसेवकाकडे, सेनेच्या हाफिसात मोर्चा घियून गेलो तरी आमाला कचरं येचु दिनात' म्हणणारे निरागस भाव, सगळंच विलक्षण, विलोभनीय. कचराच मागत होत्या त्या पूर्णवेळ, मदत किंवा सहानभूती नाही. शिक्षण घेतल्याने सगळं उत्तम मार्गी लागतं ही ठाम समजूत आणि संस्कारांच्या स चीही ओळख नसलेली ही मक्ख जमात. कुतूहल, उत्सुकता यांचा लवलेशही नाही पण देवनारचं डम्पिंग ग्राउंड का बंद झालं हे सांगितलं तर ठिणग्या उडाव्यात तसा उसळता राग अगदी. राग तरी कुणावर? कशासाठी? ना त्यांना माहिती न मला समजला..

गोवंडी येथे राहणाऱ्या वस्तीतील स्त्रिया देवनार डम्पिंग ग्राउंडवर कचरा वाचण्यासाठी जातात. परंतु त्याची क्षमता पूर्ण झाल्यानंतर सरकारने ते बंद केले आणि एका खासगी कंपनीला देवनार विभाग सोपवला. त्यानंतर या विभागात अत्याचार फार, अगदी पंधरा वर्षाची मुलगी नाल्यात फेकून दिली पासून पाच वर्षाचं लेकरू बलात्कार करून पोत्यात भरून बाथरूममध्ये ठेवलं असं सहज म्हणतात त्या. त्यांना धुण्याभांड्याची काही कामं मिळतात पण फार टिकत नाहीत. गोवंडी भागात गुंड प्रवृत्तीची माणसं फार म्हणून त्यांना दूरच ठेवलं जातं. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणं मुश्किल कारण ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांचा अभाव. आम्हाला काही रोग नाही, कोरोना आम्हाला शिवला नाही.. ताप तर कधीच येत नाही म्हणताना टीबी आणि कॅन्सर सारखे आजार कचऱ्यात काम केल्याने होतात हे त्यांना माहितीच नाही. नवरा दारू पितो, नांदवत नाही म्हणून सर्रास आईच्या घरी येऊन राहतात. पदरात 4-5 लहान मुलं. मुलगी झाली तर तिचं तोंड बघायला पण नवरा फिरकला नाही म्हणणारी फक्त विशीतली असावीशी तरुणी. कचऱ्यातल्याच एखाद्या पाकिटात चिवडा मिळाला तर भुकेला तो खावा इतकं सहज आयुष्य आहे त्यांचं. त्यांना माझं आयुष्य समजत नाही आणि मला त्यांचं आयुष्य पटत नाही इतकाच काय तो आमच्यातला फरक! 

यांच्या व्यथा ऐकताना डोळे दाटून येतात, यांचा भार पृथ्वीला होऊ नयेसं वाटतं.

Monday, 26 July 2021

आज गुरुपौर्णिमेबद्दल संत नामदेवांची सांगितलेली गोष्ट..

 मी आता 25 वर्षांची होईन तरी माझी आई मला अधून मधून छोट्या मुलांसारख्या गोष्टी सांगत असते.

आज गुरुपौर्णिमेबद्दल संत नामदेवांची सांगितलेली गोष्ट..
एकदिवस एका नदीतीरी सगळे संत जमले असतात. त्यात नामदेव सुद्धा असतात. संत नामदेवांना गुरू नसतो. आणि त्याचं कारण असं की नामदेवांना थेट देवाशी संवाद साधता येत असतो. चक्क देव ज्याच्याशी बोलतो त्याला आणखी गुरुची गरजच काय? तर त्या नदीकिनारी झालेल्या संमेलनात नामदेवांचा अहं कसा घालवता येईल याची योजना आकार घेऊ लागते. मुक्ताई गोरा कुंभाराकडे त्याचा लोटा मागते आणि प्रत्येकाच्या डोक्यावर वार करते. कोणीही काहीही प्रतिक्रिया देत नाहीत पण नामदेव मात्र चिडतात. तेव्हा ती म्हणते हे भांडं जरा कच्च आहे. आणि सगळे मिळून नामदेवांना गुरूच्या शोधात पिटाळतात.
संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातल्यावर सरतेशेवटी संत नामदेव औंढा नागनाथ येथे येतात. तिथल्या एक शंकराच्या मंदिरात विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपी गेले असतात. कोण्या एक क्षुल्लक माणसाला अशा अवस्थेत पाहून नामदेवांचा संताप अनावर होतो. तेव्हा विसोबा म्हणतात तुला त्रास होतोय तर तू माझा पाय उचल आणि दुसऱ्या ठिकाणी ठेव. आणि नामदेव जेवढ्या ठिकाणी पाय उचलून ठेवतात तेवढ्या शंकराच्या पिंडया उगवतात. म्हणतात ना पिंडी ते ब्रह्मांडी, आणि नामदेवांना साक्षात्कार होतो. आपण ज्याच्याशी बोलतो तोच फक्त देव नाही तर देव चराचरात आहे. हेच नामदेव पुढे ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे निघून जातात. आणि विठ्ठल आणि कृष्ण कसा एकच आहे हे पटवून देण्याचे काम करतात.
कथेचा उद्देश इतकाच की कुणीतरी गुरू असावा, जो मार्ग दाखवेल, चुका दाखवून देईल, चुका सुधारण्यास संधी देईल, जगण्याला कारण देईल. शंकराच्या पिंडीसारखाच गुरू सुद्धा तुम्ही प्रत्येक माणसात, प्रत्येक निर्जीव वस्तूत पाहू शकता. फक्त इतकंच की शिकून घेण्याची तयारी असायला हवी. एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहता यायला हवं. कोणत्याही गोष्टीवर चटकन प्रतिक्रिया न देता विचार करता यायला हवा. माणूस, त्याचा इतिहास, त्याच्या 'तसं' वागण्यामागची कारणं समजून घेता यायला हवीत. या इतक्या शक्ती जोपर्यत वश होत नाहीत तोपर्यंत एक गुरू पुरेसा आहे. तुमचा सर्वाधिक विश्वास ज्या गोष्टीवर आहे, जिला तुम्ही मित्र बनवू इच्छिता अश्या व्यक्तीला/गोष्टीला खुशाल गुरुत्व बहाल करा. की विश्वाशी मैत्री होईल आणि या विश्वाला जाणून घेतल्याने तुमचं अस्तित्व तुमच्या नजरेत ठळक होईल.
या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा गुरू सापडावा अशी कामना करते. 🙏

निरंतर समुद्राचीच,

 गुंफत जातोस तू..

तुझे शब्द, स्पर्श
आणि विणले जातात बंध
मग उमटतात त्यावर रंग
एका शिंपल्याचे, कुस्करलेल्या चाफ्याचे
उनाड पावसाळी आभाळाचे
जसे ठेवणीतल्या अत्तराचे
उरात साठवून घ्यायला श्वास पुरत नाहीत माहितीये?
आणि दरवळत राहतात हे गंध मग..मनभर
हे विणकरी गुंफणारे, गुंतणारे हात आवरते घेऊ नकोस
पुरवत जाईन मी, माझं प्रेम.. अविरत
निरंतर तुझीच,


एका फेसबुक प्रश्नाने झालेलं विचारमंथन. जाणकारांनी यात अजून भर घातल्यास आवडेल*

 विचार हा शब्द सुद्धा भाषेनेच दिलेला आहे, अर्थात शब्द नंतर आला पण भावना त्याही आधी होतीच.

पूर्ण वाढ झालेल्या मानवी मेंदूमध्ये हास्य, करुणा, द्वेष/राग(प्रेम), भय, मत्सर, किळस, वासना,अद्भुतता, शौर्याची भावना ही शब्दाविना/भाषेविना विकसित झालेली असते. लहान बाळाला लहानपणापासूनच जंगलाच्या हवाली केले तरी या इतक्या भावनांची त्याला जाणीव होत असते.. अगदीच प्राण्यांना सुद्धा या भावनांची जाणीव होत असते.
आपण करतो ते विचार ही या भावनांची पुढची पायरी असते, त्याला भाषेचा ठोस आधार मिळालेला असतो. भाषेंमुळे भावनांना एक वजन प्राप्त होते. भाषा हे भावना मोजण्याचे परिमाण म्हणू शकतो आपण. शेवटी भाषा हे एक माध्यम आहे जे आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाते. ज्यामुळे आपले विचार प्रगत होतात.
आणि ते विचार व्यक्त करण्याचे सगळ्यात बेसिक आविष्कार म्हणजे चित्र रेखाटणे, अश्रू, स्पर्श, आवाजाचा स्वर, नर्तन आणि त्याचा किंवा साऱ्याच कृतींचा वेग आणि चेहेऱ्यावरचे हावभाव, पडलेले खांदे, झुकलेली किंवा रोखलेली नजर... लिहिणं आणि बोलणं ही कृत्रीम गोष्ट आपण भाषेकडून शिकलो आहोत. भाषेमुळे/लिपीमुळे आपल्या भावना एनकोड करणं आणि इतरांसाठी त्या डीकोड करणं सोप्प झालं.
भाषेचा वापर आपण किती चांगल्याप्रकारे आणि यशस्वीरीत्या करू शकतो त्यावरुन आपल्या मेंदूची कार्यक्षमता ओळखली जाऊ शकते.. असे मला वाटते.
एका फेसबुक प्रश्नाने झालेलं विचारमंथन. जाणकारांनी यात अजून भर घातल्यास आवडेल*

हिंगोली- अभ्यास सफर

 मुंबई विद्यापीठातून communication and journalism विषयात पदवी संपादन करत होते त्यावेळची गोष्ट आहे. Documentary film making असा एक विषय होता त्यासाठी डॉक्युमेंटरी चित्रित करण्यासाठी म्हणून हिंगोली ला गेलो होतो. या भागात आमचाच एक वर्गमित्र गयानाथ सूर्यतळ याचं गाव आहे, सेंदूरसना. त्याच्या गावातल्या शाळेत मुक्काम करायचा होता आणि त्यांच्याच गावातल्या जीवनावर आधारित छोटे छोटे विषय घेऊन माहितीपट बनवायचे होते. विषय तयार करणं, महितीपटाची मांडणी करणं त्यानंतर चित्रीकरण आणि मुख्य म्हणजे हे सगळं आपल्या ग्रुप मेंबर्स शी विचार विनिमय करून. आणि फक्त 3 दिवस. रेकीसाठी, पाहणीसाठी वेळच नव्हता.

गावात प्रवेश केल्या केल्या काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या अशा की, सेंदूरसनाचा माणूस मुखदुर्बळ आहे. भाषा एकच, मग? कदाचित शहरी आणि ग्रामीण जीवनशैली चा फरक हे त्याच्या न्यूनगंडाचं कारण असावं का? गावानं हसून स्वागत केलं, पण त्यांच्या चेहेऱ्यावर व्यथाच हसत होत्या. मला कळतच नव्हतं, प्रश्न विचारल्यावर त्यांच्या हालचालीत दिसणारा थंडपणा, 'गरीबाच्या चेष्टा करता का म्याडम?' असं म्हणताना ते चेहेऱ्यावरचं अगतिकतेचं हास्य गोष्ट सुचू लागायला पुरेसं होतं. डोळ्यात स्वप्न विझलेली पण कुतूहल मात्र होतं. त्यांचा आनंद त्यांना लपवता येत नव्हता. गेल्या गेल्या अगदी लहान मुलांपासून ते मध्यमवयीन पुरुषांपर्यंत सगळ्यांनीच माझ्याभोवती गराडा घातला. माझ्या धर्माची आणि पेहेरावाच्या पद्धतीची चौकशी झाली आणि त्याबद्दल थोडी नाराजीही व्यक्त झाली. पुरुषाला लाजुन चूरर होताना मी इथे प्रथम पाहिलं, पंचवीशीतल्या माझ्याइतक्या मुलांना त्यांची स्वतःची 2 पोरं असतात. इथली घरं वाडासंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात. परंतु घरांवर कौलं किंवा पत्रे नाहीत, पर्जन्यछायेखालचा प्रदेश असल्याने त्याची गरजही भासत नाही तर नुसतंच छप्पर आहे. बऱ्याचशा गोष्टी जगापेक्षा वेगळ्या करायची संस्कृती गावाने जपून ठेवली आहे. परंतु त्याची कारणं आणि त्यांच्या गरजा ते सांगू शकत नाहीत.
एका बाजूला टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला तलाव आणि त्यातून जाणारा रस्ता, त्या रस्त्यालगत गाव वसलेलं आहे. म्हणजे माझी पर्वणीच होती. सकाळ-संध्याकाळ माझी भटकंती चालत असे. दुपारचं काही वेळ काम होई तेवढंच. माझा मुळात स्वभाव माणूस जाणून घेण्याचा असला तरी इथे मला त्यांची गरिबी, त्यांचे प्रश्न, त्यामागची कारणं, त्यांची अगतिकता आणि कष्ट काहीकाही दिसत नव्हतं, मला जगून घ्यायचं होत6 ते गाव, साठवून ठेवायचं होतं सगळंच, डोळ्यात मनात वहीत.. ते भर पावसाळ्यातलं रखरखीत सौंदर्य, भटकायचं होतं मनमुराद, दुर्गेचं मंदिर, गढीचे अवशेष, खानबाबाचा दगड, शेतं, बांध, तलाव. तलाव! तसं त्या 4 दिवसाच्या वास्तव्यात तलावात मी रोज डुंबले पण त्या एका संध्याकाळी मी माझा एक मित्र आणि गावतलेच 2 छोटे पंटर तलावावर गेलो होतो. त्यावेळी आलेला पाऊस, वारा, विजा, धड हसताही येत नव्हतं, माझ्यापासून फूटभर अंतरावर असलेल्या मित्राशी बोलताही येत नव्हतं. ती वेळ पुन्हा कधी येऊ नये आणि त्या स्मृती पुसल्याही जाऊ नयेत. आयुष्यात एकदातरी घ्यावेच असे पहिले आणि शेवटचे अनुभव मी त्या दिवसात घेतले. सौरभ सोबत रात्री भुताच्या गोष्टी सांगत, ऐकत माळावर भटकणं, थिनले सोबत हातात हात घेऊन कोऱ्या अंधारात पायाखाली जमीन चाचपडत टेकड्या चढणं, आणि एक शब्दही न बोलता चंद्रकोर पाहत टॉपवर जाऊन झोपून राहणं। ही मुलगी तिबेटीयन आहे, तिची आणि माझी 2 वर्षात नुसती नावापुरता ओळख, तिची भाषा वेगळी, बोलण्याचा लहेजा वेगळा पण त्या हातातल्या हातांचे स्पर्श मला स्पष्ट ओळख देत होते.
आता थोडं कामाबद्दल,
आम्ही ठरवताना 3 माहितीपट बनवण्याचे ठरवले होते. बाजार, खाद्यसंस्कृती आणि पोटापाण्याचा व्यवसाय. नंतर तिन्हीचा मिळून एकच माहितीपट तयार झाला ही गोष्ट अलाहिदा. बाजारात गेलो होतो, मी ग्रुप सोडून एकटीच निघाले, त्या अस्ताव्यस्त गल्ल्या खुणावत होत्या मला, कोपर्या कोपऱ्यातून खुणावणाऱ्या असंख्य कथा सारे माझ्या वहीत टिपून घेण्याचा वेडा अट्टाहास चालू होता माझा. मला पाहून मशिदींची दारं बंद करणारे मुस्लिम बांधव, आमचा फोटो घ्या म्हणणारी शिवाजीच्या पुतळ्याखालची टवाळ पोरं, रिकाम्या दवाखान्यातून बरोबर नेम लावत पिचकाऱ्या मारणारे डॉक्टर आणि पेशन्ट नसल्याने मुलीच्या पायाच्या जखमेवर ड्रेसिंग करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ. त्याबरोबर रंगीबेरंगी वस्तू विकायला घेऊन बसणारे होतेच, बैलांच्या विविध झुली, त्यांचे सजावटीचे साहित्य यालाही भाव होताच, तिथेच एका ठेल्यावर तिथला लोकल पदार्थ खाल्ला, मुगाच्या डाळीच्या भजी, खिचडी आणि त्यावरून भरपूर ताकाची कढी. घरी आल्यावर मी कित्ती प्रयत्न केले तसं बनवायचे.. नाही जमलं. तिथेच माझं छोटसं अपहरण सुद्धा झालं. काही युवकांनी एकटीला हेरून गाडीवर बसवली आणि ओसाड जागी नेलं. त्यांना वाटले होते की मी त्यांच्या जमिनी मोजमाप करण्यासाठी शहरातून आले आहे. खरं काय समजल्यावर दुःख व्यक्त करून माफी मागितली आणि परत आणून सोडले. त्यानंतर मी माझ्या रटाळ ग्रूप सोबतच फिरले.
पाऊस कमी असला तरी हिंगोली हिरवी साद घालत होतं. शेती पूर्णतः पावसावर अवलंबून त्यामुळे पशुपालन हाच काय तो गावकऱ्यांचा आधार. इथे भात पिकत नाही तरी त्यांच्या रोजच्या आहारात भाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तूर डाळीचं उत्पादन घेतलं जातं तसंच ज्वारीचा एक प्रकार 'टाकळी' आणि त्यासोबत सोयाबीन लावला जातो. एकाच शेतात सगळी पिकं एकत्रच घेतली जातात. पिकं तयार व्हायचा कालावधी वेगळा आणि पावसाची मर्जी त्यामुळे जमीन ओसाड वाया जाऊ नये हा उद्देश. कापसाचे पीक नगदी, भरपूर पैसे कमावून देणारं जरी असलं तरी शेतकरी मात्र पांढर्याफटक कपाशीसारखाच पिंजलेला राहतो. बाजार भाजीपाला व धान्याने समृद्ध असला तरी खरीदाराला महागला आहे. त्यांना मोठ्या दर्जाची बाजारपेठ उपलब्ध व्हायला हवी. भाव जरी चांगला मिळाला तरी मजुरीचा खर्च, माल ने आण करण्याचा वाहतुकीचा खर्च, वाजबाकीच खूप लांबते.
गावातील सरपंच स्त्री आहे, पण तिला नवी साडी नेसून फक्त बहुलीसारखं बसवलं जातं, आमच्या प्रश्नांना उत्तरं पण तिचा धनीच देत होता, तिला बोलुदया म्हंटलं तर तिला बोलताही येत नव्हतं आणि तो बोलुही देत नव्हता.
गावात बौद्ध समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं प्रमाण जास्त आहे, तरी सारे एकजुटीने राहतात. मंडळी कलाकार आहेत, गाण्याची, वाजवण्याची आवडही आहे आणि कलाही आहे, पण श्रोता नाही. गाण्यांना नवे विषय नाहीत, सगळीच गाणी आंबेडकरांभोवती फिरतात.
गावात एकही शौचालय नाही. आम्ही जाणार म्हणून गयानाथच्या घरी शौचालय बांधून घेतले तसेच शाळेत नावाला असलेल्या शौचालयाचे काम पूर्ण केले.
हे लोक 3 वेळेस जेवतात. नाष्टा हा प्रकार फक्त शहरी पाहुणे आले तरंच. शेतावर जायच्या आधी भातभाजी खाऊन जायचं, दुपारची भाकरी कोरड्यास बांधून न्यायचं आणि सांजवलं की आपापल्या घरात जेऊन गुडूप व्हायचं.
पण आताशा गाव रिता रिता वाटू लागला. ज्यांच्या डोळ्यांत स्वप्न फुलली ते शहराकडे पळाले. शिकण्यासाठी, जगण्यासाठी आपापले मार्ग जोखु लागले. अशी अनोखी संस्कृती पाहिलेले हे बोळ, गल्ल्या ओस पडू नये हीच काय ती आता काळजी.

वेश्यावृत्ती कायदेशीर!

 वेश्यावृत्तीसाठी कायदेशीर मान्यता? मुळात देहविक्रय करणं गुन्हा होताच केव्हा? तुमचं शरीर हे सर्वस्वी तुमच्या मालकीचं असतं. मानवी तस्करी हा ग...